Monday 21 May 2012

शिक्षण व परिपक्वता



www.daptaryswiwah.com आमच्या कडे लग्न करू इच्छिणारे तरूण मुलां-मुलींचे फोन येत असतात.काहीवेळेस ते प्रत्यक्ष भेटायला येत असतात.ते भेटायला येतात तेव्हा त्यांच्याशी मोकळेपणी बोलणं होतं.ते ही त्यांच्या अडीअडचणी सांगतात आणि उपायांसाठी चर्चा करतात.एखादा निर्णय घेतांना या चर्चा खूप उपयोगी पडतात असं आमच्या लक्षात आलं आहे. कालही एक छान व्यक्ती आली.ती उच्च शिक्षित होती.आणि तसाच उच्च शिक्षित जोडीदार तिला हवा होता.आम्हांला यात काहीच वावगं वाटलं नाही.आपल्या बरोबरीने शिकलेला जोडीदार असणं ही अपेक्षा फारशी चुकीची नाही.आणि त्यात काही तर्कशुद्ध कारण असेल तर काहीच हरकत नाही.पण जेव्हा ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीचे पालक जेव्हा एका विशिष्ट शाखेचाच आग्रह धरू लागले तेव्हा मात्र आम्हांला आश्चर्य वाटलं.जेव्हा तिने त्या शाखेचा संदर्भ परिपक्वतेशी लावला तेव्हा मात्र आमच्या आश्चर्यला पारावर राहिला नाही.म्हणजे एखाद्या विशिष्ट शाखेत तुम्ही उच्च शिक्षण घेतलं असेल तर तुम्ही परिपक्व आणि दुसऱ्या शाखेतील उच्च शिक्षण घेतलेली व्यक्ती अपरिपक्व असं कसं काय? समज वाढावी म्हणून दोन्ही शाखांमध्ये असं कोणतच शिक्षण दिलं जात नाही.हे त्या व्यक्तीला माहित नसेल का?आपण कोणत्या शाखेचा अभ्यास करायचा हे आपल्या आवडीनुसार,पालकांच्या इच्छेनुसार,बाहेर कशाला अधिक पैसा मिळणार आहे हे बघून ठरवतो.कोणता अभ्यासक्रम केला म्हणजे आपण समजदार होवू,परिपक्व होवू याचा विचार कोणी करत नाही.
    कामाचे तास,त्यासाठी करावी लागणारी तडजोड विशेषतः मुलींना ,मिळणारा पैसा,प्रतिष्ठा यांचा विचार करून खूप जण विशिष्ट व्यवसायातील ,शाखेतील व्यक्ती जोडीदार म्हणून निवडतात.ते सांगतांना काही सांगोत.पण मूळ हे पैशात असते.मग



असे एका शाखेची मुलं-मुली ती बहुतेक वेळा सोफ्टवेअर मधील असतात.ती त्यांच्या कामाच्या शेड्यूल मध्ये एकमेकांना वेळ देवू शकत नाही. काही ठिकाणी तर एका वेळी एकच जण घरी थांबू शकतो अशी त्यांची कामाची वेळ असते.ते एकमेकांशी बोलू शकत नाही,काही ठरवू शकत नाही. तरीही त्यांना सहजीवनचा जोडीदार असाच हवा असतो.काही ठिकाणी तर कला शाखेत छान उच्च शिक्षण घेतलेल्या मुलीनाही  जोडीदार मात्र सोफ्टवेअर मधील अपेक्षित असतो.असं का होतं? समान आवडी-निवडी असणारा जोडीदाराची अपेक्षा त्या का करत नाही.समजा यांना काही साहित्यिक कार्यक्रम ऐकण्याची,नाटक पाहण्याची आवड असेल आणि  त्यांच्या जोडीदाराला ती आवड नसेल तर ही मुलगी किंवा मुलगा काय करणार? आपल्या आवडी-निवडी सोडून देणार? एक विशिष्ट प्रतिष्टा जपण्यासाठी पोकळ आयुष्य जगणार.कोणत्याही अभिजाततेचा कधीच शोध घेणार नाही.उच्च शिक्षण घेवून आपापल्या क्षेत्रात चमकणारी माणसं अनेकदा बुरसटलेल्या विचारांची,अंधश्रध्द,डोळ्याला झापडं लावून साचेबंद जीवन जगतांना दिसतात. म्हणजे लग्न ठरवतांना आपण नक्की काय पाहत आहोत?फक्त पैसा? जबाबदारी आणि कर्तव्य यांशिवाय येणारा  पैसा?

  आज बहुतांशी मुला-मुलीना मुंबई-पुणे आणि सोफ्टवेअर कंपनी यांचीच साथ हवी आहे.ते दुसरीकडे बघायलाच तयार नाही.या सगळ्याचा अर्थ  कोणाही सामान्य व्यक्तीला कळणार नाही असं थोडच आहे.कारण लग्नाच्या बाजारात मात्र ते ‘शिक्षण बघितलं जातं ते केवळ पदव्यांच्या मोजमापातच!इंजिनियर,डॉक्टर,सी.ए.असेल तर सर्वांनाच ते स्थळ आवडतं,हवं असतं.अमेरिकेतील मुलगा तर त्याच्या साठी भरपूर विचारणा होते.जर या कोणत्याही स्थळाशी नाही जमलं आणि वय ही वाढत गेलं तर मग एक-एक पायऱ्या खाली उतरतात.त्यावेळी ते कमीत कमी पदवीधर,नाहीतर किमान डिप्लोमा झालेला मुलगा असावा असं मुलींना व त्यांच्या पालकांना वाटतं. या ठिकाणी सुसंस्कृत कुटुंब,परिपक्वता,विचारसरणी यांचा विचार फार नंतर येतो.प्रथम विचार येतो तो पैशाचा? नंतर शहराचा,नंतर आमची मुलगी तिथे काही करू शकेल किंवा येणारी मुलगी त्या शहरातली असली आणि नोकरीत असली तर अधिक उत्तम.कारण काळ बदलला आहे ,दोघांनी काम केलं तरच योग्य अशा राहणीमानात राहू शकू.जोडीदाराच्या शिक्षणाचा विचार करतांना त्याबरोबर जे भावी जीवन वाट्याला येणार आहे त्याचाही विचार तितकाच महत्वाचा आहे.कारण उच्च शिक्षणाच पद,पैसा,प्रतिष्ठा याबरोबर सम प्रमाणात असलं तरी वेळेशी मात्र असं व्यस्त असतं. शिवाय अशी व्यक्ती ‘माणूस’ म्हणून कशी आहे, हे वेगळंच! जोडीदार निवडतांना याचं भान हवं.
  लग्नाचा विचार हा एक सोबती,सहजीवनासाठीचा एक जोडीदार,साथी,काही समान आवडी असणारी आयुष्यभराची सोबत यासाठी किती प्रमाणात होतो हे मात्र जोडीदार निवडण्याच्या आजच्या criteria  वरून काहीसे गुपितच राहते.मग आयुष्यभर एक जिगसॉ पझल खेळले जाते.शिक्षणाने स्वतःला एक वेगळे व्यक्तिमत्व मिळते.स्वतःला ओळखण्यासाठी काही कौशल्ये विकसित होतात.तरीही आपण त्याचा उपयोग स्वतःला ओळखण्यासाठी न करता केवळ त्यातून आर्थिक उत्पन्न कसं वाढेल याचा विचार करतो.

Wednesday 9 May 2012

सप्तपदी




    
www.daptaryswiwah.com   डॉक्टरांची नृत्यकला स्पर्धा झाली होती आणि त्यात मयंक आणि मधुरेला प्रथम बक्षीस मिळालं होतं.उत्कृष्ट जोडी म्हणून सगळेजण त्यांचं कौतुक करत होते. ते दोघेही खुशीत होते. खुशीतच मयंकने मधुरा पुढे हात केला आणि स्टेजकडे चलण्याची खूण केली.पण मधुराला वाटलं,एवढ हातात हात घालून जायचं कशाला? म्हणून तिने नंतरची खुण केली. तर मयंक म्हणाला,अग लाजतेस कशाला? सप्तपदी सुद्धा आपण अशीच पुरी केली आहे. सगळ्या हिंदू लग्नात सप्तपदीची परंपरा पाळली जाते. काहीजण त्याचा अर्थही जाणूनही घेतात.पण नवीन काळात अनेक गोष्टी बदलल्या आहेत.पण आपल्याला लग्न करून ते छान टिकवायचे आहे तर ती सप्तपदी थोडी वेगळी असावी असं नाही वाटत.?वाटतं ना?
    त्या सप्तपदीचा विचार करतांना मला लग्नाकडे वळणारे पहिलं पाऊल हे स्वतःला ओळखणे हे वाटते. आपण कसे आहोत हे एकदा आपल्याला कळले की,प्रेमाची परिभाषा ठरवता येते. कारण बऱ्याच मुला-मुलींना स्वतःला नक्की काय आवडते? स्वतःचा स्वभाव कसा आहे? हेच स्पष्ट नसते. ते कपडेलत्ते,खाणंपिणं,या मुद्दांपर्यंतच विचार करतात. या आवडण्याच्या पलिकडे विचार करायला हवा.तर आपल्या जोडीदाराला त्याच्या पद्धतीने वाढायला वाव देता येईल आणि मगच ते प्रेम होईल.
  स्वतःला ओळखून प्रेम करता आले की,दुसरी पाऊल आहे.बदल स्वीकारण्यास तयार रहा. कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय लग्नामुळे होणारा बदल स्वीकारा. आज जग झपाट्याने बदलत आहे. तिथं आपण बदललो नाहीतर मागे पडू असं आपल्याला वाटते न? तसेच आहे.लग्नाकडे पारंपारिक नजरेने न बघता नवीन काळाच्या दृष्टीकोनातून बघायला हवे.म्हणजे जोडीदाराकडे  विशिष्ट चौकटीतून न बघता तो जसा आहे तसा बघा,आणि वेळोवेळी होणारे जोडीदारातील विधायक,नैसर्गिक बदल स्विकारा.
     लग्न करतांना आणि केल्यावर अनेक प्रकारच्या भूमिका आपल्याला आपोआप मिळतात.त्या त्या भूमिकांना आपण न्यायही देत असतो. पण पती-पत्नीच्या भूमिकेत अनेक सत्र असतात. त्यांची देवाणघेवाण करता यायला हवी.आजकाल सर्वजणांना शिकलेली आणि नोकरी करणारी मुलगी हवी असते. कारण दोघांच्या पगारात घर चालविणे सोपे जाते.म्हणजे स्त्री कमावण्याची जबाबदारी घेते आहे. तिच्या भूमिकेशी समांतर पुरुषांनाही आपल्या भूमिकेत बदला करायला हवेत.घर संभाळण,मुलांचं संगोपन,घरातील वृद्धांची सेवा यातली कौशल्य आत्मसात करायला हवीत. घर दोघांचं आहे.म्हणून भूमिकेत अदलाबदल गरजेची आहे.
   घरामध्ये जोडीदाराबरोबर राहतांना मुखवटे टाळा,ते घालू नका. इतरांशी वागतांना एक चेहरा आणि घरात वागतांना दुसरा चेहरा असं आपण करत असू तर जोडीदाराला गृहीत धरणं होईल.असं करु नका. जोडीदाराचा स्वाभिमान दुखवू नका.

         जोडीदाराचा सन्मान हे पाचवे पाऊल आहे. फक्त आधारासाठी,स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी नातं नसतं.जोडीदारा विषयी आदर,प्रेम मनापासून असायला हवं.जोडीदार सुंदर,पैसेवाला या कारणासाठी तो सन्मान नको तर त्याच्यातील छोट्या गुणांवर प्रेम करा. समोरची व्यक्ती ही स्वतंत्र आहे.हे लक्षात ठेवायला हवं नाही का?
      लग्न पूर्ण जबाबदारीने केले की त्याची अडचण वाटत नाही. म्हणून लग्न झाल्यावर सुद्धा विकसित व्हा.हे पुढचे सहावे पाऊल आहे. दोघांच्या  वेगवेगळ्या गुणांना वाव मिळेल. अशा संधी स्वीकारणं आणि विकसित होणं सहजीवनातला आनंद वाढवतो.
  केवळ लग्नातून नाही तर संपूर्ण जीवनभर शिकतच असतो. परंतु लग्नासह शिकत राहता आलं पाहिजे.इथे स्वयंशिक्षण  ला ,आत्मपरीक्षणाला पर्याय नाही.लग्न ही जगण्याची ,कौशल्य शिकवणारी शाळा आहे.कारण दोन वेगळ्या अनोळखी व्यक्ती एकमेकांशी अत्यंत अनोख्या नात्याने लग्नामुळे जोडल्या जातात.आपल्यात भावनिक मानसिक पातळीवर अनेक बदल होतात.त्यांना सामोरं जाणं आणि त्यातून स्वतःला घडवण हे आवश्यक असतं.
  मित्रांनो या पाऊलांवरून चालले की लग्न ही एक सुंदर गोष्ट होवून जाते.

Wednesday 2 May 2012

स्वच्छ नजर


  

www.daptaryswiwah.com सुनीत आणि मितालीच लग्न आमच्या कडून ठरलं  व जेव्हा ते दोघे हे सागायला आले त्या वेळेस आम्ही त्यांना विचरल कि त्यांनी एकमेकांना कसं समजून घेतलं .कसा लग्नाचा निर्णय घेतला. एकमेकांना कसं पडताळून पाहिलं?
    तर सुनीत म्हणाला की,मी मितालीच प्रोफाईल पाहिलं तेव्हा तिच्याशी संपर्क साधला. तिने पालकांशी बोलून भेटायचे ठरवले. तो म्हणाला माझ्या बहिणीने  मला  विचारले होते की, ती सुंदर आहे का? तर तो म्हणाला होता,मला ह्याचे उत्तर देता येणार नाही कारण ती कशी व्यक्त होते हे मला पाह्यला फार आवडत. तो म्हणतो की ,मिताली सहजपणे इतरांना मदत करते. ती स्वतंत्र्यही  आहे आणि प्रगल्भही आहे.
       मित्र -मैत्रिणींनो तुम्हांला हे वाचायला नक्की आवडेल की,मिताली एका छोट्या गावातून शिक्षणासाठी प्रथम शहरात आली. तिचे आई-वडील फारसे शिकलेले नाही. ते गावात धान्याचा व्यापार करतात. पण मित्लीने एकीकडे काम केले व शिक्षण घेतले. ती कोणावरही अवलंबून नाही. तिची राहणी साधी आहे. ती अशी बाहेरून एकटी शहरात  स्वतःला घडवत गेल्याने ती कोणावर पटकन विश्वास ठेवत नाही . सुनीत म्हणतो ,ती माझ्यावरही पटकन विश्वास ठेवत नाही. याचा त्याला कधी कधी राग येतो. पण तो समजतो त्या मागचे     तिचे कारण.
       सुनीत आणि मिताली जेव्हा भेटले तेव्हा ते एकमेकांशी स्वतः च्या  लहानपणाबद्दल  बोलले. त्या दोघांच्या राहणीमान मध्ये काहीसा फरक आहे. पण त्याकडे त्यांनी नाक मुरडून न पाहता दाद देत कौतुकाने पहिले. मिताली म्हणते ,आमच्यात चांगला संवाद होतो. आम्हांला एकमेकांच्या भेटीत   ताण जाणवला   नाही.आम्ही दोघही  बुद्धिमत्ता ,संवेदन क्षमता आणि समतोल यांच चांगलं मिश्रण आहोत. आम्हांला दोघांना एकमेकांचा जोडीदार म्हणून कसा विचार करायचा ,कोणाला कशात आनंद वाटतो. काय खूप आवडत आणि काय अजिबातच  आवडत नाही. हे एकमेकांच्या फोन वरच्या संपर्कातच कळले. मग आम्ही प्रत्यक्ष  भेटलो तेव्हा परत पडताळून पहिले. एकमेकांना 'अवकाश ' कसा देता येईल याचाही आम्ही विचार केला.  
     सुनीत म्हणतो,मिताली शहरात एकटी,स्वतंत्र्य राहिली पण ती टोंम बॉय नाही आणि बायकीही नाही. ती बोलायला वागायला सहृदय ,कोमल आहे.पण धीटही आहे. दुबळी तर अजिबातच नाही. तिला स्वतःचा सन्मान आहे. तर मिताली त्याच्या बाबतीत म्हणते ," सुनीत पक्का रसिक आहे . तो त्याचे काम दुसऱ्यावर टाकत नाही. मुख्य म्हणजे त्याच्या आईने त्याला 'पुरुष' म्हणून वाढवलं नाही. त्या दोघांना ट्रेकिंग आवडते आणि चालायला तर खूपच आवडते.
      सुनीत आणि मितालीने एकमेकांना अनेक बाजूने समजावून घेत , विचार करून लग्नाचा  निर्णय घेतला. त्यांना लग्नाबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या,कर्तव्य ,संकट ,कुरबुरी ,छोटे -मोठी आनंद सगळ्याचं कौतिक वाटतं. ते म्हणतात,आजकाल आम्ही लग्न झालेल्या जोडप्याचं निरीक्षण करतो,त्यांची कशावर भांडण होतात. हे बघतो आणि केस स्टडी सारखा त्याचा अभ्यास करतो. त्यामुळे पुढे मार्ग काढण्यासाठी लागणारा वेळ वाचेल असं त्यांना वाटतं . दोघांनाही न्यूनगंड ,अहंगंड नाहीत. स्वच्छ नजरेने त्यांचे पालक आणि ते एकमेकांकडे पाहतात.
    यात सुनीत ,मिताली आणि त्यांचे पालक यांना आपले घर ,त्याची पार्श्वभूमी त्यातील पैशा बद्दलचा विचार,शिक्षण ,नोकरी शहर यांचा विचार स्पष्ट होता. त्यामुळे ते कुठेही गेले तरी स्वतःला घडवू शकतील याची त्यांना खात्री वाटते .
 असं एकमेकांना नीट समजून घेवून लग्न ठरवत असू तर हे निरोगी समाजाचं चिन्हच म्हणायला हवं नाही का?