Monday 9 April 2012

अहंकार


अहंकार
www.daptaryswiwah.com आम्ही मुलाकडचे आहोत,आम्ही कशाला त्यांना फोन करून विचारू किंवा आमची माहिती सांगू’ असं एक काकू तावातावानं सांगत होत्या. मागच्याच आठवड्यात अशाच एक काकू आमच्या मैत्रिणीला फोनवरून सांगत होत्या की,तुम्ही मुलांची माहिती वगैरे देतात हे ठीक आहे पण ‘माझी मुलगी लाखात एक आहे,ठरवलं तर रस्त्यावरचा कोणीही राजकुमार तिला उचलून नेईन.’किंवा आणखीन एकजण म्हणत होत्या,माझ्या मुलाला पाहिलं तर ५६ मुलींची रांग लागेल’. अशा प्रकारची वाक्ये आपण सर्वचजण ऐकत असणार किंवा कधीकधी असमजुतीने बोललोही असू.
   मित्र-मैत्रिणींनो आपण सर्वचजण दिवसांतून १०-१५ वेळा तरी जग बदलल्याची ग्वाही देत असतो.मग ३०-३५ वर्षापूर्वीचीच वाक्ये आणि समजुती आपल्याला काय सांगत आहेत?आपण मुलाकडचे म्हणजे श्रेष्ठ,सुंदर मुलगी म्हणजे रस्त्यावरचा राजकुमार.आज या दोन्ही गोष्टी वास्तवाच्या नजरेतून पहिल्या तर किती भयानक आहेत हे आपल्या लक्षात येत नाही का?
  आज प्रत्येक घरात एक किंवा दोन मुलं असतात.प्रत्येकाला ती महत्वाची वाटतात.लग्न ही तर दोन मनां बरोबरच दोन कुटुंबांनाही जोडणारी गोष्ट आहे.तरीपण आमच्या काकू आपल्या आपल्या मुलाची माहिती आपणहून सांगण्यास तयार नाही किंवा एखाद्या चांगल्या मुलीची माहिती मिळाली तर आपणहून तिच्याशी संपर्क साधत नाही.मग अशावेळी त्या मुला-मुलींनी काय करावे.स्वतःच स्वतःच्या लग्नाचे बघावे का? त्यांनी स्व्ठ्ठून ऑनलाईन मुलीचा फोटो,माहिती पहिली,पालकांना सुचवली तरी त्यांना ते फारसे रुचत नाही.केवळ स्वतःच्या अहंकारा पोटी दोन्ही कुटुंब अडून राहिली तर आपण बदललो असं कसं म्हणणार.अर्थात माणूस म्हटलं की,’अहं’ आलाच.पण दोघांनीही समजुतीनं घेतलं तर विवेकाने काही विधायक गोष्टी होतील.मैत्रिणींनो रोजच्या आयुष्यातही आपण या ‘अहंकाराला तोंड देत असतो.पण लग्न सभारंभात मात्र  तो विशेष सभारंभीय थाटात वावरतांना दिसतो.
      विवाहासाठी ऑनलाईन नाव नोंदवणारी अनेक मुलं-मुली आहेत.त्यातील कित्येकजण तर आधुनिक शास्त्रातले,व्यवस्थापनतले पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.ते स्वतःच्या शहराला घट्ट चिकटून आहेत. त्या चौकटी बाहेर त्यांना जायचे नाही किंवा दुसरं काही त्या पलिकडे चांगलं असू शकतं हे ही ते बघायला तयार नाही. म्हणजे मी मुलगा आहे,इतका भरपूर पगार मिळवतो,तसेच मी मुलगी आहे,सुंदर आहे,भरपूर शिक्षण घेतले आणि भरपूर पगाराची नोकरी आहे. या रूढ विचारा बरोबर माझं शहर सोडून मी येणार नाही किंवा जाणार नाही.किंवा तिथली मुलगी नको,मुलगा नको.असं काहीसं चालू आहे.काय म्हणायचं याला.अति आधुनिकपणा ?नवीन पिढी जर आपण स्वतःला म्हणत आहोत तर मागच्या पिढ्यांपेक्षा कोणता नवीन विचार आपण करत आहोत? हे बघायला पाहिजे नाही का?
   काही पालक आणि त्यांची मुलं मात्र खूप समजुतीने वागतात. ते समजून घेतात की,लग्नाची गरज दोघांना आहे,मुलगी कुठे नोकरी करत असेल तर आपणहून तिच्या सुट्टीच्या दिवशी ते भेटण्याचे ठरवितात. तसेच आम्ही’मुलाकडचे’ ही रूढ पद्धत ते बाजूला ठेवतात.आमच्या कार्यालयाला भेट देणाऱ्या सविता आणि शीला काकू आम्हांला नेहमी आदर्श वाटतात. त्या दोघीजणी विहिणी आहेत.पण आता त्यांची छान मैत्री झाली.सविता काकू त्यांच्या मुलासाठी स्थळ बघत होत्या.सहज बोलता बोलता त्यांना मीनलची माहिती मिळाली. त्या आपलं सगळं काम टाकून त्यांच्या संपर्कात राहिल्या आणि आज त्यांची मुलं छान संसार करीत आहेत. त्या म्हणतात,अहो,मुलगा-मुलगी शिक्षण ,नोकरी यात सेटल होईपर्यंत त्यांचं वय २७-२८ होतं आणि त्यापुढे जर आम्ही पालकांनी आमचे इगो सांभाळत राहिलो तर ह्या मुलांनी लग्न कधी करावे आणि आम्ही नातवंडं कधी पहावीत.त्यांची वय वाढली तर सगळंच अवघड होईल.कारण समस्या काही तुम्ही मुलाकडच्या की मुलीकडच्या असं विचारून येत नाही.

No comments:

Post a Comment